पदपथ पादचार्‍यांसाठी की फेरीवाल्यांसाठी? नागरिकांचा सवाल   

पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये अनधिकृत हातगाड्या, फेरीवाले, स्टॉलधारक यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. या बेकायदा अतिक्रमणांमुळे नागरिकांना रोजच्या वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून, पादचार्‍यांना पदपथांवरून चालणे कठीण झाले आहे. या बेकायदा अतिक्रमणांमुळे पादचार्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, महात्मा फुले मंडई यांसह विविध रस्त्यांवर पथारी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या अतिक्रमाचा विळखा व वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
 
शहरातील रस्त्यांवर बेकायदा पथारी व्यावसायिकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.  अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येते, मात्र काही वेळानंतर त्या ठिकाणी दुकाने थाटल्याचे दिसून येते. शहराच्या मध्य वस्तीतील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता यासह नामदार गोपाळकृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन कॉलेज रस्ता), जंगली महाराज रस्ता, सारसबाग, तुळशीबाग, शिवाजी रस्ता तसेच उपनगरांमधील रस्त्यांवर आणि चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात पथारी व्यावसायिक, स्टॉलधारक आणि हातगाडीवाल्यांनी अतिक्रमणे केली आहेत. यामुळे रस्त्यांवरील फूटपाथवरून चालणेही अवघड झाले आहे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर कापडविके्रते पदपथावर दुकाने थाटतात. त्यामुळे पादचार्‍यांना रस्ता काढणे अवघड होत असल्याचे नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. पदपथ हा नागरिकांसाठी नसून कापडविक्रेत्यांसाठी आहे का? असा संप्तत सवाल नागरिकांनी केला आहे. हा पादचारी मार्ग नागरिकांसाठी मोकळा ठेवण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणीदेखील अनेकांनी केली.
 
बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता आदी ठिकाणी पदपथ अतिक्रमित असल्याने नागरिकांना थेट मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहतूककोंडीतही भर पडली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे पदपथ मोकळे करण्यासाठी व अतिक्रमण हटवण्यासाठी तात्काळ उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.
 
नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मंडई, शिवाजी रस्ता, सारसबाग परिसर, जंगली महाराज रस्ता यांसारख्या प्रमुख ठिकाणी पथारी व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून, नागरिकांच्या दैनंदिन कामासाठी अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाकडून अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येते, मात्र ती केवळ तात्पुरती ठरते. काही वेळानंतर पुन्हा तिथेच दुकाने उभी राहतात. विशेषतः गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर कापड विक्रेते पदपथावर थेट दुकाने लावतात. त्यामुळे पदपथ नागरिकांसाठी आहे की विक्रेत्यांसाठी? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Related Articles